मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उचललेल्या नोटबंदी व जीएसटीच्या पावलांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे व काळ्या पैशाला चाप लागला आहे. ज्या लोकांचे काळ्या पैशाचे व्यवहार होते ते लोक व त्यांना पाठिंबा देणारे राजकारणी यामुळे दुःखी झाले असले, तरी हे निर्णय देशहिताचे असल्याने सर्वसामान्य लोक मात्र त्यावर खुष आहेत,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्यावर्षी आठ नोव्हेंबर रोजी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, भाजप प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, आमदार राज पुरोहित, आमदार डॉ. अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, गणेश हाके, विश्वास पाठक व अतुल शहा उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘नोटबंदीमुळे दडविलेला पैसा लोकांना बँकांमध्ये भरावा लागला. एकूण नोटांपैकी ९९ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्यामुळे सरकारला काळा पैसा बाळगलेल्यांची माहिती शोधणे सोपे झाले आहे. १७ लाख ७३ हजार अशी बँक खाती सापडली आहेत ज्यांच्यामध्ये भरलेले पैसे हे त्यांच्या मालकांच्या आयकराच्या माहितीशी विसंगत आहेत. बँका व वित्तीय संस्थांनी ४.७ लाख खाती संशयास्पद असल्याचे कळविले आहे. या सर्व खात्यांची तपासणी चालू आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हजारो बनावट कंपन्या सापडल्या असून त्यांच्या बँक व्यवहारांचाही शोध लागला आहे.’
गडकरी पुढे म्हणाले, ‘नोटबंदीमुळे घरांच्या किंमती घसरल्या आहेत. गृहकर्जाच्या आणि शैक्षणिक कर्जाचे व्याजदर घसरले आहेत. नोटबंदीमुळे दहशतवादी व नक्षलवाद्यांचा आर्थिक पुरवठा रोखला गेला. हवाला व्यवहारांना चाप बसला. डिजिटल आर्थिक व्यवहार ५८ टक्के वाढले. पन्नास लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बँक खाती उघडून त्यामध्ये पगार थेट जमा होऊ लागला.’
‘देशात एक डिसेंबरपासून रस्त्यावर येणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग सक्तीचा करण्यात आला असून मार्च २०१८ पर्यंत २५ लाख गाड्यांना फास्टॅग लावण्यात येईल. त्यामुळे कॅशलेस पद्धतीने झटपट टोल जमा होईल. जीएसटी लागू केल्यानंतर वाहतूक क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. चेकपोस्ट हटविल्यामुळे ट्रक वाहतुकीचा वेळ कमी झाला असून ट्रकचालकांची दरवर्षी प्रत्येकी दीड लाख बचत होणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.